एप्रिल महिन्या सारखी गर्मी फेब्रुवारीत ! ४ दिवसांत राज्यात प्रचंड तापमान वाढण्याची शक्यता ?
1 min read
मुंबई : (वृत्तसंस्था)- सध्या राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. किमान आणि कमाल तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा वाढला आहे. राज्यभरात कोरडे आणि शुष्क वारे वाहत असून उन्हाच्या झळांचा चटका अधिक बसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून पहाटेचा गारठा कमी झाला असून आता केवळ हलका गारवा आहे. थंडी वातावरणातून गायब झाली असून येत्या ४ दिवसांत राज्यात नागरिकांना प्रचंड उकाडा जाणवणार असल्याचे हवामान विभागामार्फत कळवण्यात आले आहे.
महाराष्ट्र हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात येत्या चार दिवसांत ३-४ अंशांनी वाढणार असून किमान तापमानही वाढणार आहे. बहुतांश ठिकाणी हवामान कोरडे राहणार असून उष्णता वाढणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, शनिवारी पुण्यात कमाल तापमानाचा पारा ३८-४१अंशांपर्यंत गेला होता. तर किमान तापमान १५-१८ अंशांच्या घरात होते. बहुतांश ठिकाणी ३०-३६ अंशांपर्यंत कमाल तापमान होते. सोलापुरात किमान २२अंश, साताऱ्यात २३अंश सेल्सियस एवढा पारा होता.
या वर्षी उन्हाचा प्रभाव अधिक राहणार
राज्यात उन्हाचा प्रभाव वाढत असून, काही ठिकाणी 40°C च्या आसपास तापमान पोहोचले आहे. काही जिल्ह्यांत थंडी सौम्य स्वरूपात जाणवत असली तरी हळूहळू उन्हाळा जोर धरत आहे. पुढील काही दिवस राज्यभर उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे.
राज्यात कमाल व किमान तापमान कुठे आणि किती ?
राज्यात सर्वाधिक तापमान पुणे जिल्ह्यातील दापोडी येथे 41.0°C नोंदले गेले आहे. फेब्रुवारी महिन्यातच एप्रील महिन्यासारखे कडाक्याचे ऊन जाणवत आहे. पालघरमध्ये
38.5°C, साताऱ्यात (कराड) 39.3°C, रायगड (अलिबाग) 37.3°C, सोलापूर 36.8°C, आणि नाशिक (शहादा) 36.7°C इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तापमान वाढले असून, उन्हाचा तिव्र चटका जाणवत आहे. राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया येथे 12.8°C नोंदले गेले, नंदुरबार (शहादा) 13.9°C, नाशिक (कळवण) 14.6°C आणि भंडारा (साकोली) 14.5°C या जिल्ह्यातील काही ठिकाणी पहाटेच्या सुमारास काही प्रमाणात गारठा आणि गार वारं वाहात आहे.