राज्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या २१ टक्केच पाणी साठा शिल्लक
1 min read
मुंबई: (प्रतिनिधी)- राज्यात सर्वत्र पावूसपडत असला तरी राज्यातील प्रमुख धरणांमध्ये सध्या फक्त २१ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षाच्या तुलनेत त्यामध्ये चार टक्क्यांची तूट आहे. केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.केंद्रीय जल आयोगाकडून देशभरातील प्रमुख १४६ धरणे आणि जलाशयांची साप्ताहिक माहिती जाहीर केली जाते. ३० जूनअखेरीस देशातील सर्व धरणांमध्ये ६९ टक्के एवढाच पाणीसाठा उपलब्ध होता. महाराष्ट्रात मात्र ही टक्केवारी फार कमी असल्याचे दिसून येते. तसेच, २२ जूनला संपलेल्या आठवड्याच्या तुलनेत पाऊस चांगला पडूनही ३० जूनअखेरीस या साठ्यात फारशी वाढ झालेली नसून देशभरातील प्रमुख जलाशयांमध्ये राज्यातील ३२ जलशयांचा समावेश होतो. त्यांमध्ये ३० जूनअखेरीस एकूण क्षमतेच्या २१ टक्के पाणीसाठा होता. हा आकडा मागील वर्षी याच कालावाधीत २५ टक्के होता. राज्यभरातील या जलाशयांची एकूण क्षमता १,९१६.६० कोटी घन मीटर इतकी आहे. त्या तुलनेत ती सध्या ४०६ कोटी घन मीटर इतकी भरली आहेत. मात्र १० वर्षांच्या सरासरीचा विचार केल्यास हा साठा क्षमतेच्या एक टक्का अधिक आहे. या अहवालात क्षमतेपेक्षा ८० टक्क्यांहून कमी भरलेली व ५० टक्क्यांहून कमी भरलेली धरणे, अशा श्रेणी करण्यात आल्या आहेत. ५० ते ८० टक्के भरलेल्या जलाशयांमध्ये राज्यातील १० धरणे, तर ५० टक्क्यांहून कमी भरलेली नऊ धरणे आहेत. उजनी धरणात धक्कादायकरित्या शून्य टक्के साठा आहे. कोयना हे प्रमुख धरण सध्या फक्त २८ टक्के भरलेले आहे. सुदैवाने पैठण येथील जायकवाडी धरणात ६७ टक्के पाणी शिल्लक आहे.
केंद्रीय जल आयोगाने धरणांच्या दृष्टीने कोकण व गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ असे भाग केले आहेत. यांमध्ये सर्वाधिक २४ धरणे ही मध्य महाराष्ट्रात आहेत. चारही क्षेत्रांचा विचार केल्यास, धरणक्षेत्रात सरासरीच्या ५२.५ टक्के पाऊस कमी पडला आहे. कोकणात (गोव्यासह) ४२३, मध्य महाराष्ट्रात ६३, मराठवाड्यात ४१ व विदर्भात ८८ मिमी सरासरी पाऊस धरणक्षेत्रात पडला आहे. पर्जन्यमानाचा विचार केल्यास ३० जूनपर्यंत जायकवाडी, भंडारदरा, कोयना, भातसा, उरमोडी, कान्हेर, पानशेत, इसापूर, येल्दरी, पेंच व अप्पर वर्धा या धरणक्षेत्रातच सरासरीहून अधिक पाऊस पडला आहे.तसेच
राज्यातील मोठ्या धरणांपैकी कोयना, भाटघर, तिल्लारी या धरणांवर जलविद्युतनिर्मिती होते. मात्र, ही सर्व धरणे ५० टक्क्यांहून कमी भरलेली असल्याने सध्या नाममात्र वीजनिर्मिती होत आहे. त्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक साठा झाला की जलविद्युतनिर्मितीचे प्रमाणात वाढ होईल,असे सांगितले जात आहे. एकंदरीत राज्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी पडला असल्याचे केंद्रीय जल आयोगाच्या अहवालावरून स्पष्ट होते.