जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

अवैधरित्या गॅस सिलिंडर वाहतूकीमुळे रेल्वेच्या डब्यात लागली आग ; ९ जणांचा आगीत होरपळून मृत्यू

1 min read

चेन्नई: (वृत्तसंस्था)- अवैध रित्या गॅस सिलिंडर घेऊन गेल्यामुळे तमिळनाडूच्या मदुराई रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. लखनऊहून रामेश्वरमला जात असलेल्या ट्रेनच्या टूरिस्ट कोचला लागलेल्या आगीत ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदुराईतील रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

या अपघातात २० जण जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये मरण पावलेल्या सर्वच प्रवासी उत्तर प्रदेश राज्यातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास आगीची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना मिळाली. त्यावेळी ट्रेन मदुराई यार्ड जंक्शनजवळ थांबली होती. काही प्रवासी अवैधपणे गॅस सिलिंडर घेऊन ट्रेनमध्ये शिरले होते, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

रेल्वेच्या कोचला लागलेल्या आगीचा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये काही जणांच्या ओरडण्याचा आवाज येत आहे. दरम्यान शेजारच्या रुळांवरुन एक ट्रेन जाते. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग नियंत्रणात आणली. आगीत टूरिस्ट कोच पूर्णपणे जळून गेला आहे जळालेल्या या कोचमध्ये एकूण ५५ प्रवासी होते .

काही प्रवासी अवैधरित्या सिलिंडरची वाहतूक करत होती. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. कोणताही ज्वलनशील पदार्थ, वस्तू घेऊन रेल्वेच्या डब्यात चढू नये, असा नियम आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, स्टेशन अधिकाऱ्याने मदुराई यार्ड जंक्शनजवळ टूरिस्ट कोचला आग लागल्याची माहिती २६ ऑगस्टला पहाटे सव्वा पाचच्या सुमारास दिली. त्यानंतर याची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली.

अग्निशमन दलाचे बंब पावणे सहाच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. सव्वा सातपर्यंत आग विझवण्यात आली. टूरिस्ट कोच व्यतिरिक्त अन्य कोणत्याही डब्याला आग लागली नाही. आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला कोच वेगळा करुन मदुराई स्टॅबलिंग लाईनवर ठेवण्यात आला आहे. प्रायव्हेट पार्टी कोचमधील प्रवासी गॅस सिलिंडर अवैधरित्या घेऊन जात होते. त्याचमुळे आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अनेक प्रवासी बाहेर पडले. काही प्रवासी फलाटावरच उतरले.

कोणतीही व्यक्ती आयआरसीटीसी पोर्टलवरुन पार्टी कोच बुक करू शकतो. त्यांना गॅस सिलिंडरसारख्या कोणत्याही ज्वलनशील पदार्थांची परवानगी नसते. यामुळे प्रवाशांना गॅस सिलिंडरची तस्करी केल्याचा आरोप आहे.