जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

एससी एसटी आणि ओबीसींच्या आंदोलनामुळे ; आज भारत बंद

1 min read

बीड सम्राट : आज बुधवार रोजी भारत बंदची हाक देण्यात आली असून, दलित आणि आदिवासी संघटनांनी हा बंद पुकारला आहे. भारत बंदच्या या आंदोलनामध्ये बसपा, चंद्रशेखर आझादची पार्टी सहभागी झाली आहे. एससी आणि एसटी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. एससी/ एसटी अंतर्गत वर्गीकरण करण्याचे अधिकार राज्य सरकारला असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिले आणि त्याविरोधातच ही भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर इंदिरा साहनी प्रकरणातील निकालावर काही प्रश्न उपस्थित केले. ज्यामुळे भारतात आरक्षणाचा पाया रचला गेला होता. संघटनांच्या म्हणण्यानुसार एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयाचा हा निर्णय धोक्याचा ठरू शकतो. किंबहुना हा निकालच सामाजिक न्यायसंहितेच्या सिद्धांतांविरोधात असल्याचा सूर या संघटनांनी आळवला आहे.

या भारत बंद आंदोलनामुळे कोणावर काय होणार परिणाम?

राजकीय घडामोडींवर या आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम होतांना दिसणार आहे. ज्यामुळे सामाजिक न्यायाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी येणार असून, मोठ्या प्रमाणात निदर्शने झाल्यास कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येऊ शकते.

या बंद दरम्यान काय सुरू आणि काय बंद राहणार?

प्राथमिक माहितीनुसार सदर भारत बंदमुळे दुकाने, व्यावसायिक आस्थापनं बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्वच व्यापारी संघटना भारत बंदचं समर्थन करत नसल्यामुळे काही आस्थापनं मात्र सुरू राहणं नाकारता येत नाही. याशिवाय बस, रेल्वे सेवा आणि इतर मार्गांवर काही प्रमाणात या बंदचे परिणाम दिसून येऊ शकतात.

देशातील काही खासगी कार्यालये सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवली जाऊ शकतात. तर, शासकीय कार्यालये मात्र सुरूच राहणार आहेत. याशिवाय बँकाही सुरू राहतील. शाळा आणि महाविद्यालयांसंदर्भातील अधिकृत माहिती समोर आली नसून, बहुंतांश शैक्षणिक संस्था मात्र दैनंदिन वेळेत सुरू राहणार असल्याचे चित्र आहे. दैनंदिन व्यवहारात महत्त्वं असणारे पेट्रोल पंप, रुग्णालयं आणि दवाखाने या सेवाही कोणत्याही व्यत्ययाशिवाय सुरू राहणार आहेत.

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या?

आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार संसदेत आरक्षणाच्या मुद्द्याला अनुसरून एका नव्या कायद्याची आखणी करण्यात यावी. या कायद्याला संविधानाच्या नवव्या यादीमध्ये समाविष्ट करत त्याला संरक्षित करून घ्यावे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयावर पुनर्विचार करून सदर निर्णय रद्द करावा अशीही संघटनांची मागणी आहे. आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार SC/ST आणि ओबीसींच्या संविधानिक अधिकारांना संरक्षण देण्यात यावे.