जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

20 January 2025

संपूर्ण ग्रामस्थांच्या उपस्थितीत गाढवाचा लग्नसमारंभ संपन्न

1 min read

सोलापूर: (प्रतिनिधी)- मान्सूनचे आगमन होऊन दिड महिना लोटला तरी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच सोलापुर जिल्ह्यातील संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात पावसाचा एक थेंब पडला नसून यामुळे सदरील परिसरातील शेतकऱ्यांची चिंतेत वाढ झाली आहे. संपूर्ण खरीप हंगाम वाया जाणार तर नाही, अशी भीती शेतकऱ्यामध्ये दिसून येत आहे. एखादा मोठा पाऊस पडताच पेरणीला सुरुवात होणार आहे. मात्र पाऊस काय पडण्याचा नावच घेत नाहीये. यामुळे मैंदर्गी ग्रामस्थांनी गाढवांचे लग्न लावून मुसळधार पाऊस पडावे यासाठी वरुण राजाला साकडे घातले आहे. मंगळवारी ११ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या शुभ मुहूर्तावर मैंदर्गी गावात ग्रामस्थांनी गाढवाचे लग्न लावून गावात वरात काढली. गाढवाचा हा लग्नसोहळा संपूर्ण मैंदर्गीकर ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला.सोलापूर जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र मागील दोन तीन वर्षांत चांगला पाऊस झाल्याने दुष्काळी जिल्हा हा नाव पुसला गेला असं मानले जात आहे. मात्र यंदाच्या वर्षी पुन्हा तशीच परिस्थितीची पुनरावृत्ती झाली आहे. दीड महिना होत आला तरी पावसाने अक्कलकोट तालुक्यात दांडी मारली आहे. सोलापूर जिल्ह्यात कायम पावसाची हमी सांगता येत नाही. सोलापुरात कधी अतिवृष्टी होते तर कधी दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळते. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलेला असतो. पाऊस जास्त झाला तर ओला दुष्काळ पडतो तर पावसाने पाठ फिरविली तर दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. दरम्यान अक्कलकोट शहरापासून अगदी काही अंतरावर मैंदर्गी गाव आहे. या गावात अनेक वर्षांपासून गाढवाचे लग्न लावून दिले जाते. पाऊस झाला नाही किंवा दुष्काळी परिस्थिती ओढवली तर मैंदर्गीकर हे गाढवाचे लग्न लावून देतात. गाढवाच्या लग्नाची लग्न पत्रिका देखील छापून आजूबाजूच्या ग्रामस्थांना निमंत्रित केले जाते. ठरलेल्या तारखेला शुभमुहूर्तावर गावातील वेशीत गाढवाचे लग्न लावून वरात काढली जाते.ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. अनेकदा गाढवाच्या लग्नानंतर अक्कलकोट तालुक्यात समाधानकारक पाऊस बरसला आहे. यंदाच्या वर्षी दीड महिना होत आला तरी पावसाने हजेरी लावली नसून संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.