जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

13 February 2025

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विदेशी कायद्यांना सुद्धा आता बोलता येणार नातेवाईकांशी

1 min read

पुणे: (प्रतिनिधी)- महाराष्ट्र कारागृह आणि सुधारसेवा विभागाने राज्यातील कारागृहांमध्ये असलेल्या पाकिस्तानी, बांग्लादेशी आणि अतिरेकी कारवायातील कैदी वगळता इतर विदेशी बंद्यांना कुटुंबियांशी व नातेवाईकांशी संपर्क साधण्याकरीता ई-प्रिझन प्रणालीद्वारे व्हिडीओ कॉलिंग सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी राज्यातील सर्व कारागृह प्रमुखांना दिले आहेत. मानवतेच्या दृष्टीकोनातून सर्व बंद्यांसाठी ही सुविधा ४ जुलै २०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यातील विविध कारागृहात सध्या ६३६ विदेशी बंदी दाखल आहेत. यामध्ये मुंबई,नवी मुंबई व इतर मेट्रोपॉलिटन शहरातील कारागृहात विदेशी बंद्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्यातील कारागृहात नायजेरियन, बांग्लादेश, केनिया, कोलंबिया, इराण, इराक, ब्रिटन, ग्रीस, गिनी, घाना, ब्राझील, थायलंड, युगांडा, चीन, पाकिस्तान, नेपाळ इत्यादी देशांचे नागरिक विविध गुन्ह्यांमध्ये अटक होऊन कैदेत आहेत. विदेशी बंद्यांचे नातेवाईक अथवा वकील प्रत्यक्ष भेटून मुलाखत घेण्यासाठी येवू शकत नसल्याने विदेशी बंद्यांना कायदेशीर मदत मिळण्यास आणि कारागृहातून सुटका होण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे विदेशी कैद्यांच्या मनात नैराश्य वाढू लागते. कारागृह प्रशासनाला या बंद्यांवर सतत निगराणी ठेवावी लागते. ही सुविधा विदेशी कैद्यांना उपलब्ध करून दिल्याने त्यांना कायदेशीर मदत लवकर मिळेल आणि कारागृहातून लवकर सुटण्यास मदत होईल. विडिओ काॅलिंग सुविधा नुकतीच प्रथमतः ऑर्थर रोड कारागृहात बंदिस्त असलेला नायजेरियन विदेशी बंदी आणि त्याचे नातेवाईक यांनी सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शनाखाली एनआयसी या संस्थेने विकसित केलेल्या ई-प्रिझन प्रणालीद्वारे बंदी आणि नातेवाईक मुलाखत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे घेतली. सदरील सुविधा यशस्वीपणे विदेशी बंद्यांना लागू करण्याची जबाबदारी कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे देण्यात आली आहे. जागा कमी अन् कैदींची संख्या दुप्पट
येरवडा कारागृहातील कैद्यांची क्षमता अंदाजे ३ हजार ६०० इतकी आहे. मात्र त्या ठिकाणी सध्या ६ हजार ४८४ कैदी ठेवण्यात आले आहेत. याचा अर्थ कारागृहात दुप्पट संख्येने कैदी ठेवण्यात आले आहेत. त्यात न्यायालयीन कैद्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे झोपण्याच्या जागेपासून आंघोळ, स्वच्छतागृहात जाणे अशा छोट्या मोठ्या कारणावरुन त्यांच्यात वाद निर्माण होत असतात. येरवडा तुरूंग हा राज्यातील सर्वात मोठा आणि महासुरक्षित तुरुंगांपैकी एक आहे. या कारागृहात स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधींपासून अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी शिक्षा भोगलेल्या आहेत.