दरड कोसळून सात ठार १२० बेपत्ता रायगड जिल्ह्यातील घटना
1 min read
रायगड: (वृत्तसंस्था) राज्यातील रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात दरड कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे. रायगड जिल्ह्याचे अतिवृष्टीचा फटका पोलादपूर तालुक्याला पडला आहे. तालुक्यातील एका ठिकाणी दरड कोसळल्याचे वृत्त आहे. या घटनेत कोणालाही इजा झालेली नसली तरी चार घरांचे नुकसान झाले आहे . तसेच रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका आदिवासी पाड्यावर मोठी दरड कोसळली असून रात्री झोपेत असतानाच अनेकांवर काळाने घाला घातला आहे. यामध्ये १२० हून अधिक लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून आतापर्यंत पाच ते सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच एकूण २७ जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. येथे आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. या घरांवर दरड कोसळली आहे. प्राथमिक माहितीनुसार, या वाडीतील ९० टक्के घरे ढिगाऱ्याखाली गेली असून मोठी जीवितहानी होण्याची भीती आहे. आता पुन्हा भूस्खलन होत असून पाऊसही सुरू असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे येत आहे. दरम्यान बचावकार्य काही वेळासाठी थांबवण्यात आले होते. आता पुन्हा एकदा हे बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत. दुर्घटना झाल्यानंतर काही लोक घाबरून जंगलात पळाले आहेत. ते परतल्यानंतरच वाडीतील नक्की किती जण या दरडीखाली अडकलेले असू शकतात, याबाबतची नेमकी माहिती मिळेल, असे आपत्कालीन बचाव पथकाच्या एका सदस्याने सांगितलं आहे.