ओपिनियन पोलचा निकाल खरंच सत्यात उतरणार का? महाराष्ट्रात लोकसभेवर कुणाचे राज्य!
1 min read
नुकताच इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स यांनी महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात ओपिनियन पोल सादर करण्यात आले आहे. त्यात राज्यातील ४८ जागांपैकी २० जागांवर भाजपचे तर काॅंग्रेसला ०९ शिवसेना (ठाकरे गट) ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ०४ जगा तसेच अजित पवार गट आणि शिंदे गटाला प्रत्येकी २ असे चित्र ओपिनियन पोलच्या माध्यमांतून स्पष्ट करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली: (वृत्तसंस्था)- काही दिवसांतच देशात लोकसभा निवडणूक होणार आहे . या निवडणुकीसाठी आता वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला असून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचा तिसऱ्यांदा सत्तेत येण्याचा प्रयत्न असेल. तर भाजप विरोधात सर्व विरोधी पक्षांनी I.N.D.I.A.अशी नवी स्ट्राॅंग आघाडी तयार केली आहे. या आघाडीचा प्रयत्न असेल की २०२४ साली देशात सत्ता बदल करायचा.
पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत कोणाचे सरकार येणार? पंतप्रधान कोण असेल? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी इंडिया टीव्ही आणि सीएनएक्स यांनी ओपिनियन पोल घेतला होता. या ओपिनियन पोलमधील महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे समोर आले आहे. हे ओपिनियन पोल कितपत खरे ठरते हा चिंतनाचा विषय आहे. देशात आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर उत्तर प्रदेशनंतर सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रातील ४८ पैकी २० जागांवर भाजपचा विजय होईल असे या ओपिनियन पोलमध्ये दाखवण्यात आले आहे. भाजपनंतर सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळतील, त्यांना ९ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेना शिंदे गटला फक्त २ जागा तर शिवसेना ठाकरे गटाला ११ जागा मिळू शकतील. राष्ट्रवादीत अजित पवार गटाला फक्त २ तर शरद पवार गटाला ४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वरील निकालानुसार राज्यात भाजपला सर्वाधिक जागा मिळत असल्या तरी एकूण सध्या राज्यात असलेल्या महायुतीला फक्त २४ जागांवर समाधान मानावे लागणार आहे. तर महाविकास आघाडीला २४ जागा मिळतील असे दिसून येते. सर्वात मोठा धक्का राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बसू शकतो असे या पोलमध्ये दाखवण्यात येत आहे. शिंदे गटाला फक्त २ जागा मिळतील. तर काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीत बंडखोरी करत बाहेर पडलेले आणि उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांना देखील फक्त २ जागांवर समाधान मानावे लागू शकते. मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास भाजपला ३२ टक्के, शिवसेना शिंदे गटाला ७ टक्के, अजित पवार गटाला ५ टक्के, काँग्रेसला १६ टक्के, शिवसेना ठाकरे गटाला १६ टक्के, शरद पवार गटाला १३ टक्के तर अन्यला ११ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. या ओपिनियन पोलनुसार राज्यात २०१९च्या तुलनेत भाजपला ३ जागा कमी मिळतील असे म्हंटले आहे. शिंदे गटाच्या १० जागा कमी होतील. अजित पवार स्वतंत्र निवडणुक लढवणार असल्याने त्यांना २ जागांचा फायदा होईल. काँग्रेसला ८ जागांचा फायदा होईल. शिवसेना ठाकरे गटाला ५ जागांचा फायदा तर राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे संख्याबळ २०१९च्या इतकेच राहणार आहे.
राज्यातून विभागनिहाय कसा असेल अंदाजित निकाल
उत्तर महाराष्ट्र
NDA- ०३
I.N.D.I.A.- ०३
विदर्भ
NDA- ०५
I.N.D.I.A.- ०५
मराठवाडा
NDA- ०२
I.N.D.I.A.- ०६
मुंबई
NDA- ०४
I.N.D.I.A.- ०२
ठाणे आणि कोकण
NDA- ०५
I.N.D.I.A.- ०२
पश्चिम महाराष्ट्र
NDA- ०५
I.N.D.I.A.- ०६