भारतात अतिवृष्टी तर युरोपमध्ये उष्णतेचा कहर ., पृथ्वीचा प्रवास विनाशाच्या दिशेने !
1 min read
वॉशिंग्टन: (वृत्तसंस्था)- जगात ग्लोबल वाॅर्मिंगचा गंभीर परिणाम दिसून येत आहे . अति थंड भागात उष्णता आणि कोरड्या भागात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली आहे . जगभरात मानवाने केलेल्या प्रगतीमुळे निसर्गाचा ऱ्हास होत आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता शास्रज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, जर ग्रह असाच उष्ण होत राहिला तर काही दशकांत सागरी प्रवाहांची एक महत्त्वाची यंत्रणा कोलमडू शकते. हे जगाच्या हवामानासाठी विनाशकारी असेल आणि पृथ्वीवरील प्रत्येकजण यामुळे प्रभावित होईल. मंगळवारी नेचर जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात असे आढळून आले आहे की अटलांटिक मेरिडिओनल ओव्हरटर्निंग करंट (AMOC) ज्याचा गल्फ स्ट्रीमचा एक भाग आहे तो शतकाच्या मध्यात किंवा २०२५ पर्यंत कोसळू शकतो. त्यामुळे मानवी जीवला मोठा धोका आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार, या अभ्यासात सहभागी न झालेल्या वैज्ञानिकांचे म्हणणं आहे की, ही एक महत्त्वाची यंत्रणा आहे. प्रवाहांच्या मोजमापांमध्ये आतापर्यंत थोडे बदल झाले आहेत, परंतु हे नवीन संशोधन चिंताजनक आहे.
याचा टर्निंग पॉइंट लवकरच येऊ शकतो. AMOC च्या प्रवाहांना एक विशाल कन्व्हेयर बेल्ट म्हणून ओळखले जाते. ते उष्ण कटिबंधातील उबदार पाणी उत्तर अटलांटिकच्या दिशेने घेऊन जाते. इथं पाणी थंड होऊन ते खारट होते आणि दक्षिणेकडे पसरण्यापूर्वी ते खोल समुद्रात बुडते. जगाची हवामान प्रणाली आणि हवामान पद्धतींचे नियमन करण्यात याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे मोठे परिणाम होतील. समुद्राच्या पातळीत वाढ होईल, ज्याचा परिणाम युरोप आणि अमेरिकेसह जगाच्या किनारपट्टीवर होईल. हिवाळ्यातील हवामान देखील यामुळे भयानक असेल. इतकंच नाहीतर उष्णकटिबंधीय प्रदेशात मान्सून सरकेल आणि त्यावेळी पावसाचे स्वरूपही बिघडलेले असेल. हवामानाचे संकट तीव्र होत असताना शास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून त्याच्या अस्थिरतेचा इशारा देत आहेत. या प्रवाहांची ताकद तापमान आणि खारटपणावर अवलंबून असते, परंतु संतुलन बिघडल्यास त्यांना धोका असतो. जसजसे महासागर उबदार होतात आणि बर्फ वितळतो तसतसे ताजे पाणी समुद्रात मिसळले जाते. यामुळे पाण्याची घनता कमी होते. जेंव्हा पाणी खूप ताजे, खूप गरम किंवा दोन्ही होते तेंव्हा ‘कन्व्हेयर बेल्ट’ थांबते. यापूर्वीही असंच घडलं आहे.
१२,००० वर्षांपूर्वी ग्लेशियर्स वेगाने वितळले आणि नंतर AMOC थांबले. परिणामी, एका दशकात, उत्तर गोलार्धाच्या तापमानात १०-१५ °C पर्यंत प्रचंड चढ-उतार झाला. वुड्स होल ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूशनचे अध्यक्ष पीटर डी मेनोकल म्हणतात की, एएमओसी बंद झाल्यामुळे ग्रहावरील प्रत्येकावर परिणाम होईल. मग ती अमेरिका असो, चीन असो, भारत असो वा रशिया असो. या शतकात AMOC कमकुवत होईल, असा अंदाज यूएनच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. परंतु सन २१०० पूर्वी ते पूर्णपणे कोसळण्याची शक्यता नाही. पण नवीन अभ्यासात समोर आलेली माहिती गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.